जिल्हा परिषद जळगाव

माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा गौरव

जळगाव लाईव्ह न्युज | ५ जून २०२२ | माझी वसुंधरा अभियान 2.0 मधील जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी झाली असल्याने पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.तसेच विभागाची ही उत्कृष्ट कामगिरी झाल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा सत्कार करण्यात आला जिल्ह्याच्या वतीने सदरील सन्मान जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री पंकज आशिया यांनी स्वीकारला.

मा.उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मा. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सदरील सोहळा पार पडला.माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण आणि जतन करण्यासाठी जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली होती.याची दखल घेऊन सदरील सन्मान करण्यात आला.यासोबतच जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत एकूण ६५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.त्यापैकी डेक्सटॉप असेसमेंट मध्ये एकूण १५ ग्रामपंचायतीची फिल्ड असेसमेंट करिता निवड करण्यात आलेली होती.त्यात पातोंडा व दहिवद ता.अमळनेर, मानमोडी ता. बोदवड, आडावद व चहार्डी ता. चोपडा, आसोदा ता. जळगाव, पहूर पेठ ता. जामनेर,अंतुर्ली व सालबर्डी ता. मुक्ताईनगर, पिंपळगाव बु ता. पाचोरा, चिनावल आटवाडे ता.रावेर, उंबरखेड ता.चाळीसगाव, न्हावी व मारुळ ता.यावल यांचा समावेश होता.